ऋतुरंग मध्ये प्रायोगिक तत्वावर एखादा प्रयोग
........आपले मत....
प्रिय रसिक,
ऋतुरंगमध्ये एखादा दर्जेदार कार्यक्रम निवडणे, सभासदांना आवडेल का नाही याचा विचार करणे, बजेटमध्ये बसविण्याकरिता मानधनाकरीता घासाघीस करणे, कार्यक्रमाच्या तारखा ठरविणे, हॉल ठरविणे, निमंत्रण देणे, फोन, एस एम एस, व्हाट्स ऍप यांनी संपर्क साधने, हॉलची व्यवस्था, प्रेक्षकांची व्यवस्था, कलाकारांचे येणे जाणे, त्यांची व्यवस्था, जेवण, कॉफीपान, मानधन देणे या व अशा अनेक कामांचे संयोजन करावे लागते. त्याने समन्वयकांना कमालीचा मानसिक थकवा येतो.
एव्हढेकरून कार्यक्रम कसा झाला, सभासदांना आवडला का नाही हे टेन्शन वेगळेच. तरीदेखील कांही समन्वयक अत्यंत निःस्वार्थीपणे हे काम करीत आहेत. कारण एकच. आपापला व्यवसाय, कामधंदा, नोकरी सांभाळून, ग्रामीण भागात रसिकांची सांस्कृतिक भूक भागविणे व मुंबई-पुण्यासारख्या शहरातच होऊ शकणाऱ्या कलाकृती आपल्या शहरात रसिकांकरीता निमंत्रित करणे व आनंद निर्मिती करणे.
पण दुर्दैवाने या सर्वात जास्त जिकिरीचे, समन्वयकाचा वेळ, शक्ती घेणारे, टेन्शन देणारे, सहनशक्तीचा अंत पाहणारे काम म्हणजे सभासद नोंदणी.
गेली वर्षानुवर्षे हे काम करताना, त्या वर्षी दर्जेदार, अभिरुचिसंपन्न कार्यक्रम देऊनही (कधी कधी निर्णय चुकतो, पण सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात) प्रत्येक वर्षी टेन्शन देणारा विचार म्हणजे सभासद नोंदणीचे टार्गेट पूर्ण होईल का? कारण माय बाप रसिकांच्या मनात काय आहे, हे शेवटपर्यंत कळत नाही.
अपेक्षा अशी आहे की दसऱ्यापर्यंतच, किंबहुना शेवटच्या एखाद्या कार्यक्रमातच सभासदांनी नोंदणी करावी, कांही दिवसात शुल्क द्यावे जेणेकरून पुढील कार्यक्रमाच्या नियोजनात ही एनर्जी वापरता येईल.
या करिता एखादी स्कीम, एखादा प्लॅन, एखादी सवलत योजना किंवा कांही आयडिया (!) सुचते का? त्वरित कळवावे,
